Sunday, August 3, 2014

भरपावसात ‘ती’ भेटली.

सरसरत आठवणीची सर माझ्या अंतर्मनात शिरते आणि चिंबाड भिजवते. ‘तिच्या’ सहवासातला पाऊस मग माझ्या मनावर बरसतच राहतो. अशाच एका पावसात ‘ती’ भेटली.
अकोल्याच्या बसस्थानकातून मी आपली छत्री उघडून बाहेर पडलो. साधारण सकाळी साडेनऊची वेळ असावी. रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती. गांधी चौकात जात असताना रस्त्यात ती दिसली. माझ्याच वयाची असेल. म्हणजे मी तेव्हा एकोणीस-वीस वर्षाच्या आसपास असेन. सळसळतं तारुण्यच म्हणा ना !
ग्रामीण भागाचा टच असणारं राहणीमान पण एकूणच मनाला मोहवणारं तिचं रूप पाहून श्रावणात जोरदार सर यावी आणि लख्खं ऊन पडावं तसंच झालं. कारण रस्त्यावरची इतर इतकी माणसं सोडून तिनं मलाच पत्ता विचारावा, असं माझ्यात काय होतं?
मी छत्री सावरत चाललो होतो, माझ्याच तंद्रीत. ती मात्र इमारतीच्या आडोशाला जणू माझी वाटच पाहत असावी. एकदम म्हणाली,
‘शिवाजी कॉलेज किती लांब आहे येथून?’ मी पटकन बोलून गेलो.
‘तुला शिवाजी कॉलेजमध्ये जायचंय?’
‘हो.. तिथे मला अँडमिशन घ्यायची आहे.. पण पाऊस, छत्रीही नाहीये. रिक्षाही मिळत नाहीये.
(म्हणजे परवडणार नाहीये असाच टोन).’
मी भीतभीतच म्हणालो,
‘मी त्याच बाजूनं चाललो आहे. माझं कॉलेज त्याच रस्त्यावर आहे. यायचं असेल तर.?’
कुठलीही ओळख नाही. रस्त्यावर भर पावसात एखादी मुलगी भेटावी, बोलावी हा धक्का पचत नव्हताच, त्यात आपण तिला आपल्या छत्रीतून ये म्हणायची हिंमत करावी अजून काय हवं?
तिनं मला वरून खालपर्यंत न्याहाळलं. तिला माझ्याबद्दल विश्‍वास वाटला असावा कदाचित. ती म्हणाली,
‘मग तर बरंच होईल. उगीच पुन्हा चुकायला नको. थेट कॉलेजपर्यंत सोडाल?’
‘हो चला ना’
असं म्हणताच ती माझ्या छत्रीत येऊन माझ्यासोबत चालायला लागली. श्रावणातला पाऊस अधूनमधून बरसत होता. एकाच छत्रीत आम्ही रस्त्यानं चालत गप्पा मारत जात होतो. एकमेकांची नावं विचारून झाली. ती खूपच समजदार वाटली. त्याचमुळे मी तिला चहा प्यायचा का असं विचारण्याची हिंमतही केली. टपरीवर आम्ही दोघांनी चहा घेतला. तिनंही जुन्या मित्राशी बोलावं त्या विश्‍वासानं गप्पा मारल्या. चालता रस्ता केव्हा संपला आणि तिचं कॉलेज केव्हा आलं हे कळलंसुद्धा नाही..
पाऊस काही थांबला नव्हता, पण ती गेली.
त्यानंतर आम्ही कधीही भेटलो नाही. ती पुन्हा कधी दिसली नाही.
पण पाऊस आला की ती आठवते.पहिली आणि शेवटचीच पाऊसभेट.

Friday, February 21, 2014

भावड्याची लव्हस्टोरी भाग २


भावड्याची लव्हस्टोरी भाग १

भावड्याला हाक मारण्यासाठी संगी वळली अन्‌ "भावड्या' असे तोंडून निघणार, तोच संगीनं स्वतःचीच जीभ चावली. नंतर "साहेबराव' म्हणून हाक दिली. मात्र भावड्या तोपर्यंत थेट कॉलेजच्या मैदानात पोचला. "फूल तर दिलं. आता पुढे? ती हाव म्हणली तं.' असा यक्षप्रश्‍न भावड्याला पडला होता. सारखंसारखं तोच प्रसंग डोळ्यासमोर येत असल्याने भावड्या अजूनही गांगरलेलाच होता. "हट्‌.. गुलाबाचं फूल द्यायं होतं. सूर्यफूल कुठून आलं.' स्वतःशीच त्याची बडबड सुरू होती. "काय भावड्या?' अरुण्याच्या आवाजाने भावड्याची तंद्रीच भंग पावली. "चल चहा घेऊ' म्हणत भावड्याने अरुण्याला बसस्टॅण्डवर नेलं. हॉटेलात वाफ ाळलेला चहा पीत असतानाही भावड्याला काही सुधरत नव्हतं.

काही दिवस भावड्या आपल्याच धुंदीत होता. संगीला आपण परपोज केलं. हे त्याला कळतच नव्हतं. फक्त एक "डेरींग' करून फूल दिलं. एवढंच त्याला वाटायचं. अधूनमधून मोरपीस अंगावर फिरवल्यासारखा अनुभव यायचा. मग आपसुकच एखादे गाणे आठवायचे. मात्र पुन्हा कॉलेजमधील तो प्रसंग आठवला की, "तिला काय वाटलं असलं' असा प्रश्‍न त्याला पडायचा. सुहासला फोन लाऊन विचारावं. असा विचारही भावड्याच्या मनात यायचा. तीन - चार दिवस कॉलेजकडे फिरकण्याची भावड्याची हिंमतच झाली नाही.

कॉलेजला गेला तर डी. एड.च्या इ मारतीकडे नजरसुद्धा टाकायची हिंमत केली नाही. "यार सुहास्या, मी फूल दिलंय' असे म्हणत भावड्यानं एकदा अख्खी स्टोरी सांगितली. सुहास मात्र "काही नाही रे. होत असतं असं.' असे म्हणत तो विषय हसण्यावारी नेला.
भावड्या कॉलेजच्या पार्किंगमध्ये मित्रांसोबत बसलेला असताना त्याला समोरून संगीची मैत्रीण येताना दिसली. ती थेट इकडेच येत असल्याचे बघून भावड्या चरकला. मात्र ती बाजूने निघून गेली. जाता-जाता हळूच "काय भावड्या, किमान वाळलेले सूर्यफूल तरी द्यायचं होतं ना,' असा डायलॉगही हाणला. आता हे काय नवीनच. "हिला कसं काय कळलं. बोंबला ! आता काही खरं नाही. अख्ख्या कॉलेजात बोभाटा झाला तर आपली वाटच लागली. घरी बा तर लाकूड घेऊनच मागं लागंल. सं गीनच तिला सांगितलं असंल.' असे एक ना दोन प्रश्‍नांची जंत्रीच भावड्याच्या डोळ्यासमोर फिरू लागली. संज्याने दूरवरूनच हे पाहिले होतं. "काय म्हटली ती. डी.एड.मधी शिकती ना ती.' आल्याआल्याच त्याने प्रश्‍न केला. "अं' भावड्या पुन्हा विचारचक्रातून बाहेर आला. "अं, अं काय करायला बे. खरं सांग' संज्या आता सोडत नाही. हे पाहून भावड्याने "कोण, कव्हा' असे उलट प्रश्‍नच त्याला विचारायला सुरवात केली. वेळ निभावून नेली.

एक दिवस झाला, चार दिवस झाले. भावड्याचं नेमकं काय चालंलय. असा प्रश्‍न पंडितरावांना (पिताश्री) पडला. "उन्हाळा सरत आला. शेतीची कामं का तुझा बा करंल.' म्हणत एक दिवस पिताश्रींनी भावड्याला घेरलाच. "मी कुठं नाही म्हणलो तात्या.' भावड्या बोलला. "येडी घुमावू नकुस. घरी दोन-दोन ट्रॅक्‍टर पडून हाय. नांगरटी कोणी करायची. आजपासनचं शेतीची कामं सुरू करायची. ते कॉलेज फिलेज लई झालं. नीट शेतात जायचं. यंदा धूळपेरणी करायची आपल्याला. काय? आधीच दुष्काळानं गेल्यावर्षी काहीबी हातात नाही लागलं' तात्या एका मागून एक ऑर्डर देत होते.

भावड्या यावेळेस विरोध करायच्या मुडमधे नव्हता. तात्याला जर कळलं. तर तो सोलूनच काढंल. एवढे त्याला माहीत होतं. आता कामाला लागल्याशिवाय पर्याय नाही. असे लक्षात आल्यावर "जा रहा हूँ पिताजी. फिर कभी घर वापस नही आऊंगा', असा हिंदी सिनेमाचा डायलॉग हाणून भावड्याने तेथून झटकन पाय काढला. भावड्याचा डायलॉग ऐकून तात्याने पायतलं पायताण हातात घेऊन भावड्याच्या दिशेने भिरकावलं. "लई डायलॉग सुचायले का बे तुले' तात्या ओरडले. तोपर्यंत भावड्या गायब झाला होता.

भावड्याची लव्हस्टोरी भाग १


"ना ही... तू खरंच सांगतो ना!', "पाह्य बरं का!', "काहीबी सांगू नको', "ठीक है ना मंग... सरळ जाऊन सांगून टाक', "नाही त एक काम कर तिचा मोबाईल नंबर असंन'... एकापाठोपाठ एक प्रश्‍न, त्या प्रश्‍नांची उत्तरे, त्यावर उपाय, फार झालं तर "सोलूशन'... असं काहीबाही सुरू होतं. नाना, संजू, बाळ्या, अरण्या यांना जे सुचत होते, ते भावड्याला सांगत होते. एव्हाना पार्टी संपून भावड्याच्या गहन समस्येवर सर्वजण चर्चा करू लागले होते. सुहास मात्र हा प्रकार "क्रश'सारखाच असल्याचे समजत असल्याने तो या सर्वांची मजा बघत होता. भावड्या बिचारा मात्र पुरता भांबावून गेला होता. 

तालुक्‍याच्या गावात भावड्याच्या आर्ट-कॉमर्स कॉलेजला खेटूनच डी.एड. कॉलेज होते. डी.एड.ला असलेल्या "संगी'ला बघताच भावड्या पुरता दीवाना झाला होता. भावड्याने इकडून तिकडून तिचे नाव संगीता आहे एवढी माहिती महत्प्रयासाने काढली होती. तात्या आणि माय दोघंपण भावड्याले काय झाले म्हणून अधूनमधून चर्चा करायचे. त्यांनी मात्र फार सिरीयस घेतले नव्हते. "आर... दोन घास तं नीट गिळत जाय.. जवा पाव्हं तव्हा घाईतच राहतुया...' माय अधूनमधून भावड्याला म्हणायची. भावड्याची गॅंग मात्र "एकदा तू सांगूनच टाक' या भूमिकेवर ठाम होती. भावड्याले नेमके आपल्याला काय होते आहे, हेच कळत नव्हते. ते न कळणे म्हणजेच टेन्शन होते. "प्रपोज' करायचे तर दूरच राहिले. 

पंचवीस एकर शेतही भावड्याला अपुरे पडत होते. भावड्याने हप्त्याने "टच स्क्रीन'चा मोबाईल घेतला होता. "आठ जीबी'चं मेमरी कार्ड टाकलेलं होतं. शेतात तासन्‌तास बसून राहायचे. मोबाईलवर पार "मैरे नैना सावन भादो'पासून आताच्या "सुन रहा है ना तू, रो रहा हूँ मै'पर्यंतची गाणी वारंवार वाजविली जात होती. सूर्य अस्ताला जाईपर्यंत भावड्या शेतातच टाईमपास करायचा. रात्री अंगणात बसला असला तरी याच्या मोबाईलवर हळू आवाजात किशोरचे "दर्दभरे गीत' सुरू असायचे. कधी कधी गॅंगमध्ये बसलेला असल्यावर भावड्या "तुम्हाला सांगून ठेवतो आपलं संगीवर प्रेम आहे' हा "वळू'मधला डायलॉग हाणायचा. एव्हाना संगीच्या मैत्रिणींनाही भावड्याचे हे प्रेमप्रकरण कळले होते. त्याही संगीताला चिडवायला लागल्या होत्या. तिला मात्र या सर्वांचा राग यायचा. एकदा भावड्याने "डेरिंग' करायचे ठरविलेच. संगीला एक फूल द्यायचे आणि तिला सगळे सांगून टाकायचे, असा निश्‍चय भावड्याने केला. हो-नाई हो-नाई करीत भावड्या कॉलेजला पोचला. यशवंती (मोटारसायकल) आज शाम्पूने धुऊन काढली असल्याने चकाकत होती. कॉलेजला जाण्यापूर्वी रस्त्यातल्या एका शेतातूनच भावड्याने फूल तोडले. आता फूल ते फूलच. मग ते सूर्यफुलाचे असले म्हणून काय झाले. भावना महत्वाच्या. मुलींना कोणती फुले आवडतात किंवा गुलाबाची फुले द्यावी लागतात, याची जाणीव भावड्याला नव्हती. त्यामुळे याने सूर्यफूल देण्याचा निर्णय घेतला. कॉलेज सुरू व्हायला वेळ होती. व्हरांड्यात संगी एकटीच असल्याचे बघून भावड्याने सूर्यफूल देऊनच टाकले. एकदाची डेरिंग केलीच. सूर्यफूल दिल्यानंतर पुढे काय बोलावे ते न कळाल्याने भावड्याला दरदरून घाम फुटला. आता जास्त वेळ उभे राहण्यात अर्थ नाही, हे लक्षात आल्यावर तो झटकन बाहेर पडला. संगीला वाईट वाटले की चांगले वाटले... याचा विचारही त्याच्या मनात नव्हता. भावड्याची लव्हस्टोरी वळणावळणाने सुरू झाली होती. 

Friday, December 20, 2013

छोटीसी कहानी.. भाग ३ (शेवटचा)


रश्मी तिन दिवसानंतर येणार होती, तिचा नवरा गेला की मग ती व्हिसा येई पर्यंत मुंबईलाच रहाणार होती. गेल्या दोन तिन दिवसांपासून मात्र रिया पण घरी आली नव्हती. रश्मीचा मात्र दर रोज फोन येत होता. तिनेच सांगितलं की रियाचं आणि तिचं बोलणं अगदी दररोज सुरु होतं.

रश्मीचा फोन आला होता, नेमका राहुलनी घेतला फोन.. काय गं? कशी आहेस? वगैरे बोलणं झालं, रश्मी म्हणाली, अरे दादू रियाचं पण लग्न ठरतंय रे.. ती आली होती का घरी? राहुल एकदम ओरडलाच.. म्हणे काय?? तिचं लग्न? कोण करतंय तिच्याशी लग्नं? त्या येडपट माणसाला एकदा बघायचंय.. चल रे उगीच काही तरी बोलू नकोस वात्रट सारखं, आईला दे फोन.. रश्मी म्हणाली.

राहुल नेहेमी प्रमाणे सोफ्यावर आडवी उशी लावून हा्तात पुस्तक घेउन बसला होता . पुस्तकाचं पान समोर उघडं होतं, पण राहुलला काही लक्षात येत नव्हतं काय वाचतोय ते…मन सैर भैर झालं होतं. असं का होतंय? तिचं लग्न ठरतंय तर मग मला का अस्वस्थ वाटतंय?? राहुल तसाच बसून राहिला. सारखं दाराकडे लक्ष जात होतं. रिया येईल आणि मग आपल्याकडे बघून हसत रश्मीच्या खोलीकडे चालत जाईल..असं सारखं वाटत होतं.

आई पण बराच वेळ बोलत होती रश्मीशी, पण काय बोलत होती तेच कळत नव्हतं. राहुल उठला आणि सरळ चप्पल पायात सरकवून बाहेर निघायला फिरायला. खूप वेळ अगदी कुठेही फिरत होता. शेवटी कॉफी हाउस मधे जाउन कडक फिल्टर कॉफी मागवली..आणि विचार करित बसला. कॉफी चा कप समोर आणून ठेवला होता वेटरने, आणि आता त्याला पण जवळपास दहा मिनिटं झाली होती. तिकडे पण त्याचं लक्षं नव्हतं. अगदी खरं सांगायचं तर कुठेच लक्ष लागत नव्हतं.. समोर वेटरने आणून ठेवलेल्या बडिशोपेच्या डिश मधे त्याने न घेतलेल्या कॉफी चे पैसे टाकले , आणि उठून चालायला लागला.

परत घरी येउन पोहोचला.. तास भर निर्हेतु भटकल्यावर.. अजूजुनही खूप लो वाटत होतं. असं का होतय?? घरी आला ,तर रिया समोर बसली होती. आईशी गप्पा मारत. आई तिच्या डोक्याव्रून हात फिरवत होती, राहुल ला जाणवलं, की आई रश्मी ला खूप मिस करते आहे म्हणून. आई म्हणाली, काय रे दादू , कॉफी घेणार? राहुल ला कॉफी हाउस मधला, न प्यायलेला कॉफीचा कप आठवला, म्हणाला.. हो. चालेल.

आता समोर रिया बसलेली होती. तिच्या समोरच्या खुर्चीवर बसला, आणि तिला म्हणाला… हं.. काय करतो गं मुलगा?? आणि रिया कडे पाहिलं. रियाच्या डोळ्यात खूप राग दिसला… तुला काय करायचंय? काय करतो म्हणे?? काहीही करित असेल….. ~! इतकं संतापायला काय झालं हेच समजल नाही राहुल ला. साधा प्रश्न विचारला .. आणि ही अशी रिऍक्शन.. गेलीस उडत.. असं म्हणून निघून जावं समोरून असं क्षणभर वाटलं..

राहुलला पण तिला चिडायला काय झालं हेच कळत नव्हतं.तिच्या चेहेऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता.. काहीच बोलली नाही ती. चिडली तर चिडु दे म्हणून समोरून नेहेमी प्रमाणे निघून न जाता, तिला काय झालंय हे समजून घेणं जास्त महत्वाचे वाटु लागलं एकदम.. तिच्या समोर बसला, आणि तिच्या कडे पाहिलं..

तिचे बोलके ब्राउन डोळॆ अगदी काहीही न बोलता खूप बोलावून गेले..राहुलच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला.. म्हणजे ………………??? हं…….!!!हे इतके दिवस का लक्षात आलं नाही? किती मुर्ख आहोत आपण?? राहुलने तिच्याकडे बघितलं,तिची नजर खाली जमिनीकडे होती. डोळ्यात दुखावल्या चे भाव दिसत होते. तसंही मुलींना आपल्याकडे कोणी पहात असलं की लवकर कळतं. रियाने नजर उचलली, आणि समोर राहुलकडे पाहिलं… आर्त नजर.. खूप काही सांगायचंय रे मुर्ख माणसा….. कधी समजणार तुला??? मला काय म्हणायचंय ते??

राहुलला अचानक जाणिव झाली की आपल्याला काय होतंय याची. अचानक रिया बद्दल खूप काळजी वाटली त्याला… एकदम आवडायला लागली ती! कित्येक वर्ष जिच्या शोधात होतो, ती हीच!!! हे पण लक्षात आलं.. राहुलने तिच्या नजरेत नकळत नजर गुंतवली अन लहानसं स्मित हास्य केलं. सगळं काही होतं त्या हास्यामधे.. प्रेम, जवळीक, काळजी , सगळं काही होतं . अगदी पुर्ण अशुअरन्स सहीत.. तिच्या पण डोळ्यात सगळं समजल्याची भावना दिसली. एकही शब्द न बोलता दोघांच्या मनात एकमेकांच्या भावना पोहोचल्या होत्या..

आयुष्यात पहिल्यांदा रिया बरोबर न चिडता बोलावंसं वाटत होतं, पण काय बोलावं ? कसं बोलावं? हेच समजत नव्हतं.संध्याकाळी नेहेमी प्रमाणे रिया ला सोडायला राहुल निघाला, तेंव्हा दोघंही एकही शब्द न बोलता चालत होते रस्त्यावरुन. रियाचं घर आलं, ती वर जायला लिफ्ट ची वाट पहात उभी होती. राहुल कडे थकलेल्या नजरेने पहात.. की आता तुच काही करु शकशील रे… नाहीतर कठीण आहे…राहुल काही न बोलता ती लिफ्ट मधे शीरे पर्यंत उभा राहिला, आणि लिफ्ट चं दार बंद झाल्यावर परत निघाला.

घरी आल्यावर पण त्याला सारखं रिया ला पहायला आलेल्या त्या न पाहिलेल्या मुलाचा चेहेरा डोळ्यापुढे सारखा येत होता. झोप येत नव्हती. आईने जेवायला बोलावलं, तरी पण ऐकू येत नव्हतं.. दुसऱ्या दिवशी रश्मी आली. खुप खुप बोलत होती आईसोबत.. आईशी मनसोक्त बोलणं झाल्यावर आई म्हणाली की आता थोडा सांजा करते..भूक लागली असेल ना?? रश्मी हो म्हणाली.. आणि आई आत गेली.

हं.. बोल दादू.. काय म्हणतोस?? असा चिंताग्रस्त का दिसतोस? काय झालं?? राहुलला कसं बोलावं हेच समजत नव्हतं. बरं आजपर्यंत रियाला पण सरळ विचारलं नव्हतंच नां.. किंवा तिला सांगितलं पण नव्हतं, की आय लव्ह यु म्ह्णून.. कसे काय लोकं सांगू शकतात असं? ह्या सगळ्या गोष्टी तर आपोआप होत असतात.हिंदी सिनेमात कसं सगळं मस्त दाखवतात, की हिरो हिरोइनला आय लव्ह यु म्हणतो.. नाही तर आपण.. नुसते मुख दुर्बळ.. कधीच सांगु शकणार नाही रियाला. बरं मी नाही, तर तिने तरी सांगायचं नां.. पण नाही.. ती पण काहीच बोलायला तयार नाही.

आता तर लग्नं पण ठरतंय तिचं, कालच येउन बघून गेला म्हणे मुलगा. तिला नकार तर येणार नाहीच.. इतकी सुंदर आहे ती.. स्वतःलाच शिव्या घालत होता राहुल, हा काय मुर्खपणा, इतके वर्षं तिला बघतो आहेस, पण कधी लक्षात आलं नाही गधड्या की ती आपल्याला आवडते म्हणून.

खरं खरं आयुष्य जर सिनेमातल्या सारखं असतं तर किती बरं झालं असतं नां?? मस्त पैकी आपण म्हंटलं असतं, आय लव्ह यु वगैरे.. मग तिने पण मान्य केलं असतं, आणि मग पुढचं सगळं…. रश्मी म्हणाली.. ओये…. दादू.. अरे कुठे हरवलास?? तसा एकदम बांध फुटला राहुलचा, डोळे भरुन आले, पण आता रश्मीला दिसू नये म्हणून तोंड फिरवलं, पण तिने पाहिलंच बहुतेक..

ती उठली , आणि हळूच राहुलच्या शेजारी जाउन उभी राहिली. त्याच्या केसातून बोटं फिरवत म्हणाली.. अरे तुला रिया आवडते नां?? झटक्याने राहुलने तिच्याकडे बघितलं, तर तिच्या नजरेत एक खोडकरपणा स्पष्ट दिसत होता.. म्हणाली, अरे मला ती वहिनी म्ह्णून आवडेल .. पण तु एक महामुर्ख, इतके दिवस झाले, कधी पाहिलंच नाही तिच्याकडे.ती पण तशीच. .. सगळ्या मनातल्या गोष्टी मनात ठेवायची.

पण माझं लग्नं ठरलं, तेंव्हा मात्र तिला विचारलंच मी एकदा.. आणि तिने मुक होकार दिला..तेंव्हाच ठरवलं, की या दगडाच्या मनात काय आहे हे पण बघु या, म्हणून मग सारखं तिला काही ना काही कारण काढून तुझ्या बरोबर बाहेर पाठवलं. मला असं वाटलं होतं की कदाचित तुझ्या लक्षात येईल, आणि सगळं आपोआप होऊन जाइल .. पण नाही… तु एक नंबरचा वेंधळा, अजिबात तुला काही समज नाही…

अगं पण तिचं लग्नं ठरतंय नां?? राहुल म्हणाला… रश्मी हसली, म्हणाली, अरे तुला तिच्या बरोबर इतक्या वेळा बाहेर एकत्र पाठवून पण तु तिला काही बोलू शकला नाहीस, तेंव्हाच माझ्या लक्षात आलं, की आता मलाच काहीतरी करावं लागेल, नाहीतर तिचं कुठेतरी लग्नं ठरेल, आणि तु बसशील हात चोळत. म्हणुन हा हुकुमाचा एक्का वापरला आम्ही..

मीच रियाला सांगितलं, की तुला सांग तिचं लग्नं ठरतंय म्हणून.. आणि तिने तुला सांगताच, तुला ही जाणिव झाली की रिया आता दुसऱ्या कोणाची तरी होणार, आणि तुला तिची किम्मत कळली. तशी पण तुला ती आवडत होतीच , पण या बातमी मुळे तुला समजलं की तुला आवडते… बस्स.. …

म्हणजे??????????? तिचं लग्नं वगैर काही ठरलं नाही??? आणि एकदम हसत सुटला. म्हणजे रिया पण सामिल आहे कां यात? अरे रियाच काय, आपली आई पण सामील आहे यात.. तिला पण सगळं माहिती आहे, तुच एकटा आहेस बुद्दु….

अरे आजी नेहेमी म्हणायची ना, एखादी गोष्ट तुमच्या समोरुन निघून गेली की मग तुम्हाला त्याची किंम्मत कळते. आणि नेमकं तेच झालं तुझ्या बाबतीत….

रश्मी आल्याचं रियाला पण कळलं होतंच.. हे सगळं बोलणं सुरु होतं तेवढ्यातच रिया पण आली.. म्हणाली काय गम्मत झाली गं ? कशाला हसताय? मला पण सांगा म्हणजे मला पण हसता येईल.. तिच्याकडे पाहिलं, अन म्हणाली… वहिनी .. बस इकडे!! असं म्हंटलं.. रियाच्या तिच्या गालावर गुलाब फुलले… आणि राहुल पण आता रश्मी समोर नसती तर आपण काय केलं असतं याचा विचार करु लागला.. :)

छोटीसी कहानी.. भाग २


दोन तिन दिवसांपासुन थोडी तब्येत नरम गरमच होती राहुलची . सुटी घेतली असती तर तो खवीस ओरडला असता, आणि मग पुन्हा घरी जातांना सुटी देतांना त्याने इशु केला असता, म्ह्णून तापातच ऑफिस मधे गेला होता. क्रोसिन घशाखाली उतरवली कॉफीच्या घोटाबरोबर , आणि आपल्या क्युबिकल मधे बसला.

डोकं भयंकर दुखत होतं, दोन कप कॉफी संपवली तरी पण शांत वाटत नव्हतं. आता दिवाळी जवळच आली होती. दिवाळीच्या सुटीला लागुनच पंधरा दिवस एल टी सी घेतली होती. बॉस ने नेहेमी प्रमाणेच कुरकुर केली, म्हणाला, ग्रो अप!! बी प्रोफेशनल.. ( म्हणजे काय असतं?? ) आणि अजुनही बरंच काही सांगत होता की कसा तो नेहेमी सुटी न घेता काम करित असतो ते. म्हणे वर्ष भर कॅजुअल सुटी घेतलेली नव्हती त्याने.आणि जर मोठं व्हायचं असेल तर सुट्या वगैरे विसरा , आता जर सुट्या न घेतल्याने मोठं होता येत असेल तर ते काय कामाचे??

दिवाळीसाठी घरी जायचं म्हणून तयारी सुरु करायलाच हवी. बरीच पर्सनल कामं पेंडींग होती, आईसाठी साडी, रश्मिचा ड्रेसचा कपडा आणि बरंच काही.उद्या सुटी आहे रविवारची, आणि पुढल्या शनिवारी निघायचंय. तेंव्हा सगळी खरेदी आधी उद्याच आटोपावी लागेल कुठल्याही परिस्थिती मधे. एसी मधे पण दरदरुन घाम सुटला, बहुतेक क्रोसिनचा असर झाला असावा.. वॉश रुम मधे जाउन चेहेऱ्यावर पाण्याचा हबका मारला, आणि समोरच्या एसी ब्लोअर खाली उभा राहिला . ताप उतरल्यामुळे आता एकदम फ्रेश वाटत होतं.

किती दिवसानंतर इतकं छान वाटलं बरं आज?? उत्साहाच्या भरात पिसी समोर जाउन बसला आणि कामाला सुरुवात केली. संध्याकाळी एमजी रोडला जायचं मनात नक्की केलं , आणि घरच्या आठवणींच्या गुंतून गेला. कसा बसा दिवस ढकलला, आणि दुसऱ्या दिवसाच्या प्लानिंग मधे राहुल मग्न झाला.

शेवटी रविवारचा दिवस उजाडला. आज खुप काम करायचं होतं, मार्केटला गेल्यावर कपडे वगैरे खरेदी केली. आईची साडी, रश्मीचा ड्रेस , पप्पांचा शर्ट सगळं झालं , तेवढ्यात त्याची नजर समोरच्या काळ्या टॉप वर गेली.. आणि त्याला रिया आठवली.. तिला छान दिसेल ना?? आणि तो पण पॅक करुन घेतला होता – वेगळा!!

होता होता, एक आठवडा कसा भुर्रकन उडुन गेला, आणि राहुल दिवाळी साठी घरी निघाला. एअर पोर्ट वर पप्पा आले होते रिसिव्ह करायला.आता पंधरा दिवस काही एक काम नाही करायचं.. नुसता आराम!! बस्स!असे विचार मनात येत होते. इथे पण मनात सारखे तेच विचार सुरु होते, की यावं कां परत मुंबईला?? बस्स झालं !!

राहुल घरी पोहोचला. सगळे जण वाट पहात होते. रश्मी , रिया दोघी पण बसलेल्या दिसल्या. तेवढ्यात फोन ची घंटी वाजली, आई ने फोन उचलला, तर मुलाकडच्यांचा फोन होता. म्हणत होते की मुलगा उद्या संध्याकाळी परत जाणार आहे, तेंव्हा फक्त उद्याच सकाळीच वेळ आहे त्याला रश्मीला पहायला येण्यासाठी. रश्मी पण लाजुन लाल झाली होती. रिया पण खोडकर पणे रश्मी कडे पहात होती.मला या बद्दल काहीच माहिती नव्हते. ही सगळी डेव्हलपमेंट गेल्या दोन दिवसातली होती. आई म्हणाली आता तुझा पण नंबर लाउ या लवकर..

दुसरा दिवस उजाडला, आणि सकाळीच दाखवणे हा कार्यक्रम आटोपला, दोघांचिही पसंती झाली, आणि लग्नाची तारीख पण नक्की करण्यात आली. इतक्या लवकर लग्न जुळतं?? राहुल थोडा आश्चर्य चकीत झाला. आई म्हणाली, की आता रश्मी सासरी गेली की मग घर एकदम रिकामं वाटेल , तेंव्हा आता दादूसाठी पण मुली पहायला हव्यात.असं कोणी म्हंटलं की लाजल्या सारखं होतंच ना.. आणि ते पण साहजिकच होतं म्हणा. आईने असं म्हंटलं की ऑफिसमधल्या वेगवेगळ्या मुलींना आपल्या बायकोच्या जागी कल्पना करुन मस्त टाइम पास व्हायचा. कधी भसा भसा सिगारेट ओढणारी ती सिन्हा बायको म्हणून कशी वाटेल? असा काही विचार मनात आला की राहुलला स्वतःचंच स्वतःला हसु यायचं. काही दिवसांपूर्वी ऑफिस पिकनिकच्या वेळेस ती शेजारी बसली होती बस मधे. रात्री परत येतांना पुर्ण टूल्ली होती.. राहुल बिचारा पुढचे दोन दिवस खांद्याला आयोडेक्स चोळत बसला होता.

रश्मीचं लग्नं ठरलं आणि मुलगा लगेच ऑन साईट जाणार, म्हणून लग्नाची तारीख फक्त एका आठवड्यानंतरचीच काढावी लागली. रश्मीचा पासपोर्ट अव्हेलेबल होताच. लग्न झाल्यावर डिपेंडंट व्हिसा मिळणं सहज शक्य होतं, म्हनुन लग्नाची घाई होती आणि घरातलं वातावरण एकदम बदलुन गेलं होतं. सगळीकडॆ खुप उत्साह होता. रिया पण सारखी रश्मी च्या मागे मागे असायची. दोघींचही पान एक मेकींच्या शिवाय पान पण हलत नव्हतं. सारखी रिया राहुलच्याच घरी असायची. तिचं पण कॉलेज संपलं होतं, त्यामुळे कूठलच टेन्शन नव्हतं तिला पण. लग्न अगदी पुर्णपणे एंजॉय करित होती ती..

लग्नाचं शॉपिंग म्हणजे एक मोठं काम. रश्मीचे कपडे टाकले होते शिवायला. रश्मी म्हणाली की दादू कपडे आणून दे माझे, सोबत रियाला पण घेउन जा.. म्हणजे ती सगळं तपासुन घेईल व्यवस्थित आणि पुन्हा दुसरी चक्कर पण होणार नाही. राहुलच्या कपाळावर चार आठ्या उमटल्या. रश्मी राहुलच्या पुढे उभी राहिली आणि त्याच्या कपाळावरच्या आठ्या दोन बोटांनी सरळ करित म्हणाली.. इतकं वाईट वाटून घ्यायला नको, रियाला सोबत ने म्हंटलं तर.आठ्या दूर कर दादू नाहीतर इस्त्री करावी लागेल !!

बाइकला किक मारुन स्टार्ट केली. रिया पण मागे बसली . जिन्स घातलेली असल्याने दोन्ही साईडला पाय घालुन बसली होती. बाइक सरळ सुरु करुन मार्केटला दुकाना समोर थांबवली. रिया खाली उतरली, तर राहुल म्हणाला, इथे नो पार्किंग आहे, तु जाउन सामान घेउन ये, मी इथेच थांबतो . भर दुपारी दोन वाजताची वेळ होती. उन्हामुळे घामाच्या धारा सुरु होत्या. स्वतःवरच वैतागला राहुल. किती वेळ लावणार अजुन ही?? इतकी वेंधळी आणि हळूबाई असेल तर हिच्या नवऱ्याचं काही खरं नाही.. आणि स्वतःशीच हसला.. तेवढ्यात रिया परत आली आणि बावळटसारखा हसणाऱ्या राहुल कडे आश्चर्याने पहात राहिली.

बराच वेळ उन्हात उभं असल्याने घसा कोरडा पडला होता, बाइक वर रिया बसली, आणि राहुलने बाइक सरळ समोरच्या शेट़्टीच्या हॉटेल समोर पार्क केली. तिने काही न बोलता हॉटेलमधे त्याच्या सोबत शिरली. तिचा चेहेरा लाल बुंद झाला होता उन्हाने. नाकाचा शेंडा थोडा जास्तंच लाल दिसत होता. घामाचे थेंब कपाळावर जमा झाले होते. पिटुकला रुमाल बाहेर काढून तिने चेहेरा पुसला.. आणि राहुलने काही म्हणण्या आधीच म्हणाली.. एक पेप्सी .. माझ्यासाठी..

लहानपणापासुन एक मेकांना ओळखत असल्यामुळे दोघंही कम्फर्टेबल होते. काहीतरी बोलायचं म्हणून राहुल म्हणाला, कॉलेज काय म्हणतंय? तिने वर पाहिलं, आणि तिच्या डोळ्यात पाहिल्यावर राहुलला समजलं की हा प्रश्न एक्स्पेक्टेड नव्हता.. शी वॉज एक्स्पेक्टींग समथिंग डिफरंट.. काय असावं बरं ते?? कपड्यांचं काम झालं होतं, आता इतर लहान सहान कामं पण होती, जसे भटजी बुवांना सांगून वेळ पक्की करणं, केटरर ला भेटुन मेनु मधले बदल सांगायचे वगैरे वगैरे..

रश्मी प्रत्येक ठिकाणी राहुलच्या बरोबर रियाला पाठवित होती. आणि रिया पण आनंदाने बाइकवर मागे बसुन फिरायची. राहुल मात्र खुप वैतागला होता.. हे काय सारखं मगे शेपुट लावल्यासारखं हिला घेउन फिरायच? सगळी कामं मी एकटाच करु शकतो नां? मग ही ब्याद कशाला मागे उगीच? पण रश्मीचं मन मोडायचं नाही, म्हणून प्रत्येक वेळेस रियाला बरोबर घेउन जात होता.

कितीही नाही म्हंटलं तरी पण रिया बाइकवर मागे बसली की त्याला आवडायला लागलं होतं. बाहेरची कामं आटोपून दोघंही परत निघाली घरी जायला. घरी जाई पर्यंत राहुलला सारखं वाटत होतं की तिला काहीतरी बोलायचंय, पण त्याच्या काहीच लक्षात आलं नाही. एक आठवडा कसा निघून गेला ते समजलं पण नाही. रश्मिच्या लग्नाचा दिवस उजाडला. लग्नाला फारच कमी लोकं बोलावले होते, फार कमी वेळ असल्यामुळे. लग्न आटोपुन रश्मी गेली तिच्या नवऱ्याबरोबर.. आता घरामधे अगदी कोणीच नव्हतं. आई तर खूप कंटाळली होती. सारखी डोळ्यात पाणी आ्णून रडत होती.रश्मी दोन दिवसानंतर येणार होती परत.

( पुढे चालु )

छोटीसी कहानी.. भाग १



संध्याकाळचे साडे सात वाजले होते. हिवाळ्याचे दिवस.. थोडं अंधारल्या सारखं झालं होतं बाहेर. राहुल वय वर्ष १५ समोरच्या सोफ्यावर बसुन हातात केमेस्ट्रीचं पुस्तक घेउन आणि त्या मधे फॅंटमचं कॉमिक्स लपवुन वाचत बसला होता. आई ओरडली की अभ्यास करतोय म्हणुन सांगायला. हे कॉमिक्स वाचणं म्हणजे एकदम पास टाइम.. आणि आजकाल तर जेम्स हॅडली ची पुस्तकं वाचायची पण गोडी लागली होती.

आतल्या खोलित राहुलची लहान बहीण रश्मी वय वर्ष १२ असेल, बसली होती आपल्या जिवश्च कंठश्च मैत्रीण रिया बरोबर खेळत. रिया आणि रश्मी लहानपणापासुनच्या मैत्रीणी. दोघी पण अगदी फ्रॉकला रुमाल पिनेने टाचुन बरोबर जायच्या बालक मंदिरात. तेंव्हापासुनची मैत्री. दर रोज संध्याकाळ झाली की रिया इकडे म्हणजे रश्मी कडे यायची खेळायला. दोघींचं एकत्र खेळणं सुरु असायचं मग.. बहुतेक बाहुली सोबत खेळणं .. आणि उरला वेळ फिदी फिदी हसत रहायच्या दोघी पण.. अगं काय झालं?? म्हणुन विचारलं, तर काहीच नाही म्हणुन अजुन जोरात हसायच्या. वेळ उरलाच तर घराच्या मागे असलेल्या घसरगुंडीवर आणि झुल्यावर खेळायला जायच्या दोघी पण.

एक मेकावर न रागावणं या बाबतीत मात्र त्यांचं एकमत होतं. कधी तरी भांडणं पण व्हायची दोघींची , पण ती क्षणभंगुर असायची. थोडा अंधार झाला, आणि रामरक्षा म्हणायची वेळ झाली की , अरे दादू , सोड ना रे रियाला तिच्या घरी… म्हणुन रश्मी मागे लागायची. आता शेजारच्या पाच बिल्डींग सोडून घर.. कशाला हवी सोबत ?? आणि एकाच तर कॉम्प्लेक्स मधे आहे? मुंबई एकदम सेफ आहे, काही होत नाही.. जाउ दे एकटीला, फारतर बाल्कनीतुन पाहतो ती घरी जाई पर्यंत.

रिया, टिपिकल कोकणस्थी स्वच्छ गोरा रंग, ब्राउन डोळे.. दिसले की अगदी मनाच्या अंतरंगापर्यंत ठाव घेतील असे.. लांब वेणीच्या टोकाला बांधलेल्या शाळेच्या निळ्या रिबन्स.. बारीक फुला फुलांचा फ्रॉक उगिच डोळ्यात आर्त भाव आणुन राहुल कडे पाहु लागली, आणि राहुल ह्या नजरेलाच खुप घाबरायचा. तिने अशा नजरेने पाहिलं की ह्याला नाही म्हणताच येत नव्हतं, आणि हीच गोष्ट नेमकी रियाला पुर्ण पणे माहिती होती.

चरफडतच हातातलं पुस्तक खाली टाकुन उठला राहुल, आणि पायात चप्पल अडकवुन तयार झाला. रिया कडे बघितलं.. शांत चेहेरा…हसरे डोळे… आणि थोडा वात्रटपणा.. कसं हो म्हणायला लावलं तुला म्हणुन डोळ्यातुन ओसंडुन वहायचा!!!!

राहुल हेच काम , म्हणजे रियाला घरी सोडायचं गेली कित्येक वर्ष न चुकता करित होता. आता त्याची सवय पण झाली होती. रस्त्याने जातांना, तु लवकर कां घरी जात नाहीस?? रोज च्या रोज मला का त्रास देतेस?? असं म्हंटलं, तर सरळ हसुन दुर्लक्ष करायची. या वयात म्हणजे १४-१५ वय असतांना मुलांना नेमकं आपल्याला कोणी कुठल्याही मुली सोबत पाहू नये असं वाटत असतं. आणि नेमकं इथे रोज रियाला सोडातांना शेजारच्या बिल्डींग मधली मुलं बघायची, त्यामुळे अजुन चिडायचा राहुल..

हाच प्रकार गेली कित्येक वर्ष चालत होता. रिया ला घरी सोडणं.. आता राहुलचं इंजिनिअरिंगचं पाचवं सेमिस्टर होतं. रिया आली होती १२वीला. तरी पण रोज संध्याकाळच्या येण्यामधे काही खंड पडला नव्हता. लहान असतांना रिया ने रश्मीच्या घरी येण्याचं कारण होतं ते घराच्या मागे असलेला झुला आणि घसरगुंडी.. पण आता मोठ्या झाल्यावर पण रियाचंच येणं सुरु राहिलं. आता घसरगुंडीवर खेळण्याचे किंवा झुल्यावर झुलण्याचे दिवस गेले होते. पण सवईचा परिणाम.. अजुनही रिया दररोज अगदी न चुकता संध्याकाळी यायची गप्पा मारायला. त्यांच्या हळू हळू आवाजात गप्पा सुरु असल्या की आई ओरडायची.. काय गं? कसल्या गप्पा मारताय इतक्या? पण काही नाही गं, उगिच काहीतरी बोलतोय झालं. असं उत्तर द्यायच्या.

राहुलला रिया बद्दल तसं कधीच अट्रॅक्शन वाटत नव्हतं . आता १७ -१८ वर्षाची झाल्यावर रिया तर सुंदरच दिसायची यात काहीच संशय नाही,पण तिच्या कडे बघितलं, की तिचा तो लहानपणी पाहिलेला ( फ्रॉकला रुमाल पिन ने टाचलेला ) अवतारच आठवायचा राहुलला , तर कधी त्या रुमालाने नाक पुसणारी रिया आठवायची, आणि त्यामुळे तशा नजरेने कधीच तिच्याकडे पाहु शकत नव्हता तो.. थोड्याच वेळात रश्मिने एक प्लेट आणली आणि समोर ठेवली.. केक आणि वेफर्स.. म्हणाली की आज रियाचा वाढदिवस आहे.. म्हणुन केक. राहुल उठला आणि उगिच पुटपुटला हॅपी बर्थ डे म्हणुन.. तिच्या कडे न पहाता.. का कोणास ठाउक पण आज राहुलला रियाकडे सार्ख पहात रहावंसं वाटत होतं.

खुपच सुंदर दिसत होती रिया आज. राहुलने दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला आणि आपलं वाचन सुरु ठेवण्याचा प्रयत्न करु लागला . रिया ने थोडं हसल्यासारखं, केलं आणि आतल्या खोलीकडे वळली. साडी नेसली की मुलगी कित्ती मोठी दिसते नां?? राहुलची नजर पुस्तका वरुन विचलीत झाली होती..

संध्याकाळी नेहेमी प्रमाणे प्लिज रियाला सोडुन ये ना रे दादू … रश्मी म्हणाली. आणि नेहेमी प्रमाणेच कुरकुर करता पायात चप्पल अडकवुन राहुल तयार झाला. तसं रिया चं घर बरोबर सहाव्या बिल्डींग मधे , पाचव्या मजल्यावर होतं. दोघंही बाहेर निघाले, आणि तेवढ्यात एकदम जोरात पाउस सुरु झाला. जवळच असलेल्या बिल्डींग कडे दोघांनी पण धाव घेतली. आडोसा धरुन दोघंही उभी राहिली. तिचा पदर अंगावर चिकटला होता, थोड्या पावसामुळे, ती आपले कपडे उगिच व्यवस्थित केल्या सारखे करित होती. मुंबईचा पाउस.. लवकरच थांबला, आणि तिला सोडुन परत निघाला राहुल.

१२वीचा निकाल लागला होता, आणि नेमकं रियाला पुण्याच्या लॉ कॉलेज मधे ऍडमिशन मिळाली होती. इतक्या दिवसांची /वर्षांची सवय असल्यामुळे दोघींना पण खुप वाईट वाटत होतं. आता संध्याकाळ कशी जाईल म्हणुन रश्मी पण अपसेट झाली होती. दोघींनी पण दिवस भर मस्ती केली , आणि शेवटी जड मनाने रियाला निरोप दिला. तशी रिया अधुन मधुन येतंच रहाणार होती मुंबईला..

होता होता,काही वर्ष निघुन गेली. रियाचं कॉलेज सुरु होतं. इकडे राहुलचं इंजिनिअरींग पुर्ण झालं होतं. त्याला पण नोकरी लागली होती , आता कामानिमित्य बॅंगलोरला जावं लागलं राहुलला. इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग करुन आयटी कंपनीत काम करणं सुरु केलं होतं त्याने. दिवस मस्त जात होते. सगळं नविन वातावरण.. इथे पण सेट झाला होता राहुल. घरची आठवण तर यायचीच. नेहेमीच घरी जावंसं वाटायचं. आईच्या हातचं जेवण सगळ्यात जास्त मिस करित होता राहुल.

इथे पैसा वगैरे जरी चांगला मिळाला, तरी पण मानसिक समाधान नव्हतं. सारखं काही तरी टेन्शन असायचंच.. प्रोजेक्ट्स , डेड लाइन्सच्या रगाड्यात इतर कुठल्याही गोष्टींचा विचार करणं शक्य होत नव्हतं. सभोवताली दिसणाऱ्या कॉस्मोपॉलिटीयन कल्चरच्या मुलींच्या कडे कधीच लक्ष गेलं नव्हतं. लंच टाइम मधे समोरच्या पान टपरीवर मुली पण मुलांच्याच बरोबरीने सिगारेट ओढतांना पाहुन थोडं चुकल्या सारखं व्हायचं.. नुकताच एक मित्र लिव्ह इन रिलेशनशिप मधे गुंतला होता. आपणही तसंच काही तरी करावं असं वाटायचं, पण हिम्मत होत नव्हती . किती दिवस काढायचे असे??

अर्थात दर चार सहा महिन्यांनी एक चक्कर तर घरी मुंबईला व्हायचीच. मग एकदा घरी गेलं ,की नुसते कोड कौतुक करुन घ्यायला आवडायचं राहुलला. आई मग मुलगा आला म्हणुन चांगलं चुंगलं खायला करणार.. मजा यायची. सुटीचा तसा प्रॉब्लेम असायचाच, त्यामुळे मात्र थोडा कंट्रोल आला होता सारखा मुंबईला जाण्याबद्दल. आता इथे मुंबईला नौकरी मिळाली तर कित्ती बरं होईल असं वाटत होतं. आयुष्यातल्या प्रायोरीटीज बदलल्या होत्या. ऑन साइट जायला मिळावं म्हणुन पण प्रयत्न सुरु होतेच. जर ऑन साईटचा लालिपॉप नसता, तर ही नौकरी कधीच सोडली असती, आणि मुंबईला परत गेलो असतो , असा विचार तर नेहेमीच धडका मारायचा .
( पुढे चालु )

एक छोटीशी प्रेमकथा


एक छोटीशी प्रेमकथा
१५ वर्षापूर्वीची गोष्ट असेल. मी त्यावेळेला शाळेत होतो. शाळा सुटली की माझा क्लास असायाचा. शाळा सकाळची होती ७ ते १२ वाजेपर्यंत आणि क्लास ३ ते ५ वाजेपर्यंत. क्लास मधे माझ्या बाजूला एक देखणा मुलगा बसायचा. पहिल्या दिवसापासून तो माझ्या बाजूला बसत होता आणि चांगला मित्र पण झाला होता. आपण त्याला ह्या गोष्टी चा राजा म्हणुया. आमच्या क्लास मधे आमच्या शाळेशिवाय ईतर मुले मुली पण असायचे. राजा पण दुसर्‍या शाळेतला होता. आम्ही क्लास मध्येच एकत्र भेटायचो. एकदम मनमोकळा स्वभावाचा. नेहमी हसरा चेहरा. एक साइड चा भांग पाडला कि दिसायला विनोद खन्ना होता. घरची परिस्थिती पण चांगली होते. त्यावेळेला सुद्धा आम्हा सर्वाना वडापाव, चॉकलेट घ्यायची त्याची ऐपत असायची. आमच्या खिशात त्यावेळेला चुकून माकून एखादे चार आणे मिळाले तर नशीब. पॉकेटमनी हा प्रकारच अस्तित्वात नव्ह्ता. पहिल्या दिवशी क्लास मधे आल्यापासून तो माझा चांगला मित्र झाला. क्लास सुटल्यावर पण आम्ही खूप धमाल करू. त्यावेळेला त्याच्या कडे सायकल होती. त्यावेळेला सायकल असणे म्हणजे आता कॉलेजात जाणार्‍या मुलाकडे मर्सिडीज असण्यासारखे होते. आम्ही डबल सीट बसायचो, अर्थात सायकल तोच चालवायचा. मला घराच्या मागच्या गल्लीत सोडायचा आणि निघून जायचा.
आमच्या क्लास मधे एक सुंदर मुलगी पण होती. लांबसडक पाठीवर रुळणारे केस, गोरीपान काया, अंगाने नाजुक शिडशिडित बांध्याची, पाणीदार डोळ्यांची. हिच ह्या कथेची “राणी”. हा राजा आणि राणी एकाच शाळेत आणि एकाच वर्गात पण होते. दोघे राहायला पण बाजूबाजूच्या सोसायटी मधे होते. राजा च्या बिल्डिंग च्या बाजुने पोलिस वसाहत चालु होत होती. तिचे वडिल पोलिस खात्यात कामाला होते. चांगल्या वरच्या पोस्ट वर होते त्यामुळे त्यांना जरा बर्‍यापैकी बिल्डिंग मध्ये रहायला मिळाले होते. राजा मुळे माझी आणि तिची ओळख झाली. मी, राजा, राणी आणि तिच्या दोन मैत्रीणी असा आमचा चांगला ग्रुप तयार झाला होता. इतर कोणाला आम्ही ग्रुप मधे घेतलेच नाही. क्लास सुरू व्हायच्या आधी आणि सुटल्या नंतर आम्ही क्लासच्या बाहेरच्या कठ्ठ्यावर गप्पा मारता बसायचो. एक गोष्ट आमच्या नजरेतुन सुटत नव्हती ती म्हणजे राजा चे राणी कडे बघणे आणि राणी ने त्याला प्रतिसाद देणे. त्यावेळचे प्रेम आता सारखे फास्ट फॉरवर्ड नव्हते. त्यावेळेला नजरेवरच सगळी भिस्त असायची. मेसेजेस पोचवायला एक तर मित्र मैत्रिणी नाही तर लायब्ररीची पुस्तके. मोबाईल काय असते हे तर दूरदूर पर्यंत माहित नव्हते. घरात एखाद्याच्याच घरी एमटीएनल चा फोन असायचा आणि पूर्ण चाळी ची भिस्त त्या नंबर वर असायची. फ्रेंडशिप डे, वॅलेन्टाईन डे वगैरे गोष्टी अजुन सातासमुद्रापारच होत्या. त्यामुळे एखादी मुली बरोबर मैत्री करायची असेल तर डेरिंग करण्याशिवाय पर्याय नसायचा अन्यथा मुलगी डेरिंग करून रक्षा बंधन ला राखी बांधायला यायची.
तर अश्या जमान्यात राजा आणि राणी च्या कच्च्या प्रेमाचे अंकुर फुटत होते. गप्पा मारताना हळूच एकमेकांकडे बघुन हसणे, डोळ्यांच्या खाणाखूणा होणे, गप्पा मारताना दोघांचे एका विषयावर एकमत होणे आणि उस्फुर्तपणे टाळी देणे, टाळी दिल्यावर रानीचे हळूच लाजून मान खाली घालणे, क्लास मधे आल्यावर पहिले एकमेकांना शोधणे आणि नेहमीच्या जागेवर दिसले नाही तर चेहर्‍यावर चलबिचल होणे. कधी राजा उशिरा आला की रानीचे क्लास च्या दरवाज्याकडे एकटक बघत वाट पहाणे आणि राजाने आत प्रवेश केला की दोघांची नजरानजर होणे, मग राजा आत येऊन जागेवर बसे पर्यंत राणी त्याच्याकडे पाहत राहायची. एकदा राजा बसला की मग तो राणी कडे पाहायचा. मग राणी खुणेनेच विचारायची, ‘ का रे? एवढा उशीर का झाला?’ राजा मग मान हलवून डोळ्याच्या पापण्याची उघडझाप करून सांगायचा, ‘ काही नाही ग! असचं !”. मग क्लास चालू असताना एकमेकांकडे लक्ष नसताना बघणे आणि चुकूनमाकून नजरानजर झाल्यावर माना खाली घालून हसणे. हे लगेच आम्हाला समजून येऊ लागले होते. पण कोणी च काही बोलता नव्हते. आम्हां सगळ्यांना त्यांची जोडी आवडत होती पण जो पर्यंत त्यांच्या मनातले समजत नव्हते तो पर्यंत आम्हाला पुढाकारही घेता येत नव्हता.
तरी आम्ही त्यांना सपोर्ट करायला कधीच सुरुवात केली होती. ग्रुप मधे बसलो असताना आम्ही खास करून दोघांना एकमेकांच्या बाजूला बसायला जागा द्यायचो. तेव्हा राजाच्या होणार्‍या ओझारत्या स्पर्शाने राणी ची कळी खुलायची आणि तिचे गोरे गाल लाल टमाटर सारखे होऊन जायचे. तर तिचे लाजणे बघुना राजा ची स्वारी एकदम खुष होऊन जायची. क्लास सुटल्यावर आम्ही सगळे जण राणी च्या घरापर्यंत चालत जायचो. एक एक मैत्रिणी ला सोडत सर्वात शेवटी राणी चे घर यायचे. मुद्दाम आम्ही मोठा वळसा घालून तिच्या बिल्डिंग पर्यंत पोहचायचो. एकदा का मैत्रीणी गेल्या की मग राजा आणि राणीच चालायचे. मी राजाची सायकल घेऊन बाजूने चालायचो. जेणे करुन दोघांना एकांत मिळावा पण एवढे पण बाजूला नाही चालायचो की जेणे करून इतर लोकांना संशय येईल. चालताना एकमेकां कडे बघणे, गप्पा मारताना ओठांपेक्षा डोळ्यांनी जास्त बोलणे हे सारे आम्हांला समजू लागले होते. त्यांना वाटायचे आम्हाला कोणी बघितलेच नाही आणि आम्ही ही त्यांना तसे कधी जाणवू दिले नाही. राणीला घरी सोडल्यावर राजा मला डबल सीट घेऊन माझ्या बिल्डिंग च्या मागच्या गल्लीत सोडायचा आणि मग निघून जायचा.
आमच्या नजरे समोर त्यांचा प्रेमाचा वृक्ष बहरू लागला होता. पण दोघांनी एकमेकांना अजूनही मागणी घातली नव्हती की एकमेकांच्या निदर्शनासही आणून दिले नव्हते. एके दिवशी आम्ही राणी ला तिच्या बिल्डिंग जवळ सोडून माझ्या घरी परतत होतो तेव्हा राजाने न राहवून मला विचारले, ‘ अरे यार ! आज काल मला कसे तरीच होते आहे. राणी ला घरी सोडले की जिव कासावीस होऊन जातो रे. रात्री पण तिची खूप आठवण येते. मग तिच्या दिलेल्या नोटस घेऊन झोपतो. तेव्हा कुठे झोप येते. काय होतेय तेच समजत नाही…तिला पण असेच होत असेल का रे?’ मी म्हटले, ‘मित्रा! तुला बहुतेक प्रेम झालेय. तिच्या मनात काय आहे ते आपण उद्दया विचारूया. आता घरी जा.’ दुसर्‍या दिवशी तो लवकरच आला पण त्याला तिला विचारायचा धीर च नाही झाला. मी म्हटले, राहू दे, जसे चालले आहे तसे चालु दे. २/३ महिने असेच उलटून गेले. दोघांनी एकमेकांना काही प्रेमाची कबुली दिली नाही. सर्व नेहमी सारखेच चालले होते. पण बेचैनी वाढत होती. शेवटी राजा ने डेरिंग करायची ठरवली आणि मागणी घालायची ठरवली. खूप विचाराअंती असे ठरले की तिला एक चिठ्ठी लिहायची. आणि क्लास सुटताना तिच्या हातात द्यायची आणि निघुन जायचे. तिला विचार करायला वेळ द्यायचा आणि दुसर्‍या दिवशी भेटायचे. मोठ्या मुश्किलीने पत्राचा मायना सुचला आणि राजाने पहिले प्रेमपत्र लिहिले. दोन दिवस तो चिठ्ठी घेउन तसाच फिरत होता. डेरिंग च होत नव्हती.
चवथ्या दिवशी तो क्लास मध्ये लवकरच आला. थोडा टेंशन मधे दिसता होता. मला वाटले की प्रपोझ करायचे आहे म्हणून टेंशन आहे. मी विचारले काय झाले तर म्हणाला, अरे यार! आज ती शाळेत आलीच नाही रे. खूप दिवस बेकार गेला. तिच्या बिल्डींग खाली एक चक्कर मारुन आलो तर ती गॅलरी मधे दिसली पण तिने बघुन सुद्धा न बघीतल्यासारखे केले आणि न हसताच आत निघून गेली. असं कधीच झाले नव्हते रे!!! काय झाले तिला? तिला समजले असेल का मी तिला प्रपोझ करणार आहे ते? म्हणुन रागवली आहे का?
मी म्हटले, ‘रिलॅक्स !!! शांत हो टेंशन नको घेऊस, ती आता क्लास ला येतेय का बघुया मग काय ते समजेल.’
आम्ही तिची वाट बघत क्लासच्या बाहेर उभे राहिलो. थोड्या वेळाने ती आली पण एकच नजर टाकली आणि निघून गेली. नेहमीसारखे हाय नाही की चेहर्‍यावर हसू नाही. चेहरा खूप लाल झाला होता. डोळे सुजले होते. बहुतेक खूप रडली होती. तशीच न बोलता जाग्यावर जाउन बसली होती. आम्ही पण जाउन बसलो. कधी एकदा क्लास संपतो आणि तिच्याशी बोलतोय असे राजाला झाले होते. शेवटी कसा बसा क्लास संपला पण आमचा ग्रुप तसाच बसुन राहिला होता. ती पण तशीच बसली होती. मी त्याच्या हातात चिठ्ठी कोंबली आणि लांब जाउन बसलो. तिच्या मैत्रीणी पण लांब जाउन बसल्या. राजा उठला आणि तिच्या जवळ गेला. हातातली चिठ्ठी तिच्या हातात देण्यासाठी तिचा हात हातात पकडला आणि तिच्या हातात चिठ्ठी देण्यासाठी तिची मुठ उघडली तर तिच्या हातात अगोदरच एक चिठ्ठी होती. तिने खुणेनेच सांगितली की ती तुझ्या साठिच आहे. राजा ने आपली चिठ्ठी तिच्या हाताता दिली आणि तिची चिठ्ठी हातात घेतली. थरथरत्या हाताने चिठ्ठी उघडली भडाभडा वाचली आणि आनंदाने उडीच मारली. आणि माझ्या कडे बघुन तिच्या चिठ्ठीचे चुंबन घेतले. तिने पण चिठ्ठीत तेच लिहिले होते आणि त्याला प्रेमाची मागणी घातली होती. तो खूप खुश झाला आणि आमचे टेन्शन कमी झाले. काय पण प्रेम म्हणावे. दोघांचे खरच एकमेकांवर मनापासून प्रेम होते. दोघांना पण एकाच दिवशी प्रपोझ करावासा वाटला.
दोघेही एकमेकांना आवडत होते. आम्ही खुप खुश झालो. पण राणी च्या मनात काही वेगळेच होते. तिने चिठ्ठी वाचली तिच्या चेहर्‍यावर हसु उमटले…डोळ्यात अश्रु आले. तशाच भरल्या डोळ्यांनी चिठ्ठी दोन्ही हातात घेउन ति राजा कडे दोन मिनिटे बघत राहिली आणि मटकन खाली बसली व शेवटी तिने थांबवून ठेवलेले अश्रू मोकळे केले आणि जोराने हुंदका फोडला. आम्हाला काय झाले समजलेच नाही आम्ही तिच्या जवळ गेलो आणि तिला शांत केले आणि विचारले. मोठ्या मुश्किलीने तिने हुंदका आवरला आणि राजा चा हात हातात घेतला आणि म्हणाली, “मी हि चिठ्ठी तुला दोन दिवसांपुर्वीच लिहिली होती पण द्यायला हिंमतच होत नव्हती. मला पण तु खुप आवडतोस रे! पण…..” आणि तिने एक मोठा पॉझ घेतला. हमसुन रडायला लागली.
ती पाच सेकंद पण आमच्या काळजाचा ठोका चुकवुन गेली. ती म्हणाली, ‘माझ्या बाबांची बदलीची ऑर्डर आली आहे. आम्हाला उद्याच ठाणे सोडून कोल्हापुरा ला जायचेय..” तिच्या एका वाक्याने आमच्या पायाखालची जमीनच सरकली. आता कुठे प्रेमाला सुरवात झाली होती आणि जुदाई पण आली. आम्ही कोणी काहीच बोललो नाही. पुढे काहि चर्चा करण्यात अर्थच नव्ह्ता. सर्व शांत झाले होते. तसेच क्लास मधुन बाहेर पडलो नेहमी प्रमाणे चालू लागलो. मी सायकल घेतली आणि पुढे पुढे चालू लागलो. एक एक करत सगळ्या मैत्रिणींना सोडले आणि तिच्या बिल्डींग खाली पोचलो. दोघे काही न बोलता तसेच बघत राहीले. कोणाला काही सुचतच नव्हते. मी शेवटी विचारले, ‘उद्या किती वाजता निघणार आहे.’
ती म्हणाली, ‘सकाळीच सहा वाजता सामान भरायला गाडी येईल आणि आठ वाजेपर्यंत निघुन जावू.’ तसच जड अंत:करणाने आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.
राजा सायकल वर सोडायला आला. बिल्डिंगच्या मागच्या गल्लीत उतरलो आणि राजाने इतका वेळ थांबून ठेवेलेले मन मोकळे केले. अगदी मनसोक्त रडला. मी फक्त त्याच्या पाठीवर थोपटत राहिलो दुसरे काय करू शकणार होतो. त्याच्या जागी जर मी असतो तर कदाचित मी काहीं वेगळे नसते केले. रडण्याचा भर ओसरल्यावर मी त्याला विचारले की तू जाणार आहेस का सकाळी? तो नाही म्हणाला. मला तिला सोडून जाताना बघवणार नाही…. ‘अरे पण ती वाट बघत राहिली तर?’ मी म्हणालो. ‘नाही बघणार आणि वाट बघितली तरी ती समजून जाईल.’ असे म्हणून त्याने खिशातली चिठ्ठी काढली आणि परत परत वाचत रडत राहिला.
पुढचे ४/५ दिवस राजा क्लासला आलाच नाही. मित्राकडे विचारले तर म्हणाला कि राजा शाळेत पणा नाही आला होता.. कदाचित तब्येत बरी नाही. विचार केला आज संध्याकाळी त्याच्या घरी जाउन बघुया. क्लास सुटल्यावर त्याच्या घरी गेलो. हा शांतापणे चादर घेऊन गादी वर पडला होता. आई ने सांगितले, ‘अरे दोन दिवसापासुन तब्येत बरी नाही. काही खातच नाही आहे. डॉक्टरांकडे घेऊन गेली तर ते म्हणाले काही झाले नाही…पण दिवसरभर झोपुनच आहे.’ मी त्याच्या बेड जवळ गेलो, त्याच्या डोक्यावरची चादर खाली केली. गोरा चेहरा लाल लाल झाला होता. कदाचित घरातल्यांची नजर चुकवून खूप रडला असावा. उशी पण ओली झाली होती रडून रडून.
मी विचारले…काय झाले?
‘काही नाही रे… तुला माहीत आहे ना.’ राजा म्हणाला.
‘तू गेला होतासा का तिला सकाळी निरोप द्यायला?’…मी
‘हो गेलो होतो. पण तिच्या समोर नाही गेलो. झाडामागुनच बघत होतो. ती खूप शोधता होती रे मला. सारखी माझ्या बिल्डिंग कडे बघत होती तिला वाटले होते की मी येईन. मला समोर जायची डेरिंग च नाही झाली. कदाचित गेलो असतो तर मला रडणे थांबवता आले नसते. शेवटी ती गाडीत बसली. तेव्हा मी झाडामागून बाहेर आलो आणि गाडी चालू झाल्यावर तिला हात दाखवला. कारण ती गाडी थांबवू शकत नव्हती हे मला माहित होते’ ‘तिने मला व मी तिला शेवटचे बघितले आणी हात उंचावुन टाटा केला…तिने पण केला…डोळ्यात पाणी असल्यामुळे तिचा चेहराच बघू नाही शकलो रे. आता ती कधीच भेटणार नाही ह्याचे खूप दु:ख वाटतेय रे…मन नुसते तुटतयं, छातीत एक असह्य कळ येतेय. मी तिच्या समोर नाही आलो म्हणुन कदाचित रागावली असेल ना रे?’
सगळा प्रसंग माझ्या डोळ्यासमोरुन गेला आणि हलकेच डोळ्यात पाणी उभे राहिले. मी चेहरा बाजुला करुन पाणी टिपले आणि त्याचा हात हातात घेऊन म्हणालो, ‘उद्या शाळेत जा, क्लासला यायला सुरवात कर जरा बरे वाटेल’.
राजा मग पुढे एक आठवडाच च क्लासला आला. तिच्या रिकाम्या जागेकडे बघुन ढसाढसा रडायचा. तिची खुप आठवण यायची म्हणुन त्याने क्लासच सोडून दिला. मला कधी कधी भेटायचा चेहर्‍यावरचे सर्व तेजच निघून गेले होते. हसणे तर विसरल्यातच जमा होते. पुढे त्याच्या वडिलांची पण बदली झाली आणि तो पुण्याला गेला. जाताना भेटूना गेला, म्हणाला, पुण्या पासून कोल्हापूर जवळ आहे, कधी तरी जाउन येइन. बघू नशिबात असेल तर भेट होईल.